बापरे बीड जिल्ह्यात आभाळातून कोसळले 2 दगड; अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक पोहोचले गावात
बीड : राज्यात गेल्या 3 महिन्यांपासून बीड (Beed) जिल्हा विविध घटनांनी चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने महाराष्ट्र हळहळला असून बीडमधील गुन्हेगारी आणि दहशतीचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. त्यामुळे, बीडचा बिहार झालाय की काय अशी चर्चा देखील सोशल मीडियावर होताना दिसून येते.
मात्र, बीडमधील काही चांगल्या गोष्टींचाही उल्लेख व्हायला हवा, बीड-परळीत अनेक चांगल्या गोष्टी घडत असून त्याचीही चर्चा व्हावी असे बीडकर म्हणतात. दरम्यान, बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे आकाशातून पाव किलो वजनाचे दोन दगड (Stone) पडल्याचा प्रकार समोर आला आहे. एक दगड शेतकऱ्याच्या घरावर पडल्यानंतर पत्र्याला छिद्र पडून तो थेट घरात आल्याचे दिसून आले. तर दुसरा दगड शेतकऱ्यांच्या घरा शेजारील गायरान जागेत आढळून आला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही दगड अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी ताब्यात घेतले आहेत
लिमगाव येथील शेतकरी भिकाजी ज्ञानोबा अंबुरे यांच्या घरावर सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठा आवाज आला. आपल्या घरावरील पत्र्यावर नेमका आवाज कशाचा आला हे पाहण्यासाठी परिसरात शेतकऱ्यांनी शोधाशोध केली. घरात गेल्यानंतर घरावरील पत्र्याला मोठे छिद्र पडल्याचे दिसून आले. त्यावेळी, घरात इतरत्र ठिकाणी पाहणी केली असता पाव किलो वजनाचा काळ्या रंगाचा एक दगड आढळून आला आहे. विशेष म्हणजे, दुपारी त्याचवेळेस घराशेजारील मोकळ्या गायरान जागेत देखील पाव किलो वजनाचा आणखी एक काळ्या रंगाचा दगड आढळून आला. त्यामुळे, या शेतकऱ्यासह स्थानिकांचे कुतूहल वाढले. त्यानंतर, शेतकऱ्याने संबंधित दगडासंदर्भात ग्रामपंचायत व तहसील प्रशासनाला कळवले होते. दरम्यान, तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही दगडांचा पंचनामा केला असून हे दगड छत्रपती संभाजीनगर येथील एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी ताब्यात घेतले आहे. या अभ्यासकांनी गावाला भेट देऊन संशोधनासाठी दोन्ही दगड ताब्यात घेतले आहेत.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या निषेधार्ह आंदोलन
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असून त्यांच्यासह सर्वांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत जोडे मारून हे आंदोलन केले, तसेच घटनेचा निषेधही नोंदवलाय.
Chikhli: बाप रे! अंचरवाडीत आकाशातून पडलं “साऊथ कोरियन” यंत्र? नागरिकांमध्ये खळबळ…